रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांचे रत्नागिरी येथे निधन झाले आहे. ते ९५ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीत आप्पा साळवी यांचं मोठं योगदान होतं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांच्याकडून शोक व्यक्त केला जात आहे.
सोमवारी रात्री आप्पा साळवी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज, मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास रत्नागिरी येथील थिबा पॅलेस या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
राजकीय प्रवास
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि कडवट शिवसैनिक म्हणून आप्पा साळवी यांची ओळख होती. ते सुरुवातीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झाले. नंतर जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास घडत गेला. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा जनसंपर्क होता.
माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांनी आधी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केले होते. १९९० च्या काळात रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी दिली. १९९५ साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात निवडून गेले होते. शिवसेना भाजपा युतीच्या शासन काळात ते आमदार होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली त्यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. १९९५-९९ या कालावधीत त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये रत्नागिरी दौर्यावर असताना आवर्जून आप्पा साळवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.




