मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. एक्स्प्रेस ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.
गोळीबाराची ही घटना जयपूर एक्स्प्रेस (१२९५६) च्या कोच क्रमांक बी-५ मध्ये आज पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. गोळी झाडणारे आरपीएफ जवान चेतन आणि एएसआय टिका राम हे दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास आरपीएफ जवान चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
नेमकं काय घडलं?
पहाटे ५.२३ च्या सुमारास बी ५ कोचमध्ये ही घटना घडली. आरपीएफ जवान चेतन आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर आरपीएफ जवान चेतनने बंदुक काढून प्रवाशांवर रोखली. दरम्यान, त्याचे वरिष्ठ अधिकारी एएसआय टिका राम यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता चेतनने त्यांना गोळ्या घातल्या. त्यामुळे एएसआय टिका राम आणि अन्य तीन प्रवाशांचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला. आपत्कालीन साखळी ओढून आरपीएफ जवान चेतन कुमार याने दहिसरजवळ खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाईंदरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला शस्त्रासह अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.




