मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. परम बीर सिंग आणि अन्य दोघांना बुधवारी मुंबईतील न्यायालयाने फरार गुन्हेगार घोषित केले. सिंग यांच्यावर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात हे प्रकरण आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी शनिवारी परम बीर सिंग यांना गोरेगाव पोलिसांनी नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात, विनायक सिंग आणि रियाझ भाटी या अन्य दोन आरोपींसह फरार गुन्हेगार घोषित करण्याच्या मागणीसाठी दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे.
शहर पोलीस आता त्यांच्या ज्ञात पत्त्यांवर नोटीस चिकटवतील आणि त्यांना 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचे निर्देश वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करतील. जर ते हजर झाले नाहीत तर पोलिस त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करतील. मॅजिस्ट्रेट कोर्टाने गेल्या महिन्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. ठाण्यातील न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात गेल्या आठवड्यात त्याच्याविरुद्ध तिसरा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. सोमवारी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने सिंग यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटचा अहवाल मागवला.
क्राइम ब्रँचने आपल्या याचिकेत म्हटले होते की सिंह यांच्याविरुद्ध गेल्या महिन्यात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटचे पालन करण्यासाठी अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यात म्हटले आहे की सिंग आणि दोन सहआरोपींच्या सर्व शेवटच्या ज्ञात निवासस्थानी पथके पाठवण्यात आली होती, परंतु त्यांचा शोध लागला नाही. सिंग यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी त्यांच्या कर्मचार्यांनी पोलिसांना सांगितले की, ते गेल्या तीन महिन्यांपासून घरात राहिलेले नाहीत किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यही घरी आलेले नाहीत.