मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता ईडीकडून देखील त्यांच्यावर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप करण्यात आले आहेत. शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं काय झालं? याचा तपास ईडी करणार आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला आहे, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का या सर्वांचा तपास आता ईडी करणार आहे. कोलकात्यातील काही शेल कंपन्या अनिल देशमुखांच्या नातेवाईकांच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे. या नातेवाईकांची चौकशी सीबीआयकडून केली जाऊ शकते.




