अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करु नये म्हणून भाजपचे अनेक नेते त्यांची मनधरणी करत होते. परंतु त्यांची ही मनधरणी फोल ठरलीय. अण्णांनी भाजपच्या आश्वाससनांकडे दुर्लक्ष करत उपोषण करणारच, असा एल्गार पुकारलाय. ३0 जानेवारी पासून उपोषणाला बसणार असे जाहीर केलंय.
अण्णांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी राळेगणसिद्धीला येणार आहेत. अण्णा हजारे यांची भेट घेऊन ते अण्णांनी केलेल्या मागण्यांवर चर्चा करणार आहेत. तसंच चर्चेतून आपण हा विषय सोडवू, असा त्यांचा आग्रह असेल. तब्बल 6 वेळा भाजप नेते राळेगणसिद्धी येऊन गेले आहेत, मात्र अण्णा आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
अण्णा हजारे यांच्या केंद्र सरकारकडे 2 मागण्या…
- शेती मालाला दीडपट हमीभाव द्यावा
- स्वामीनाथन आयोगाला संविधानिक स्वायत्तता द्यावी आणि शेतकऱ्यांच्या शेती
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी दोन वेळा अण्णा हजारे यांची भेट घेतली. आपण या वयात उपोषण करु नये, अशी विनंती करत केंद्र सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन त्यांनी अण्णांना दिलं.
अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. आज केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं.
22 जानेवारीला फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं होतं. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले होते.




