नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी आपला जीव गमावला. दरम्यान, आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘मर्डर’, ‘रोग’ सारख्या बर्याच चित्रपटांसाठी संवाद लेखन करणारे लेखक सुबोध चोप्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सुबोध चोप्रा यांचे निधन झाले.
सुबोध यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, परंतु, उपचार घेतल्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. पण त्यानंतर कोरोनामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुबोध चोप्रा यांचा धाकटा भाऊ श्यांकी यांनी दिली आहे.
श्यांकी यांनी सांगितले कि, “गेल्या शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु या सोमवारी (10 मे) त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊ लागली. त्यांना खूप थकवा जाणवत होता आणि त्यांचा ब्लड प्रेशरही वाढत होता. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे मी त्यांना मालाडच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल केले, परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या.”
श्यांकी यांनी पुढे सांगितले की, “सुबोधला हिंदी चित्रपट दिग्दर्शित करायचा होता, पण त्याची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांनी मल्याळममधील ‘वसुधा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तो एक हुशार व्यक्ती होता.”
सुबोध यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील अनेकजण दुःख व्यक्त करत आहेत. सुबोध चोप्रा 1997 पासून चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. त्यांनी डीडी 1 ची सीरियल ‘रिपोर्टर’ मधून संवाद लेखन सुरू केले. याशिवाय सुबोध यांनी टीव्ही सीरियल ‘हकीकत’ चा १ एपिसोड आणि ‘रिश्ते’चे 6 एपिसोडसुद्धा लिहिले होते. एवढेच नाही तर त्यांनी ‘सावधान इंडिया’ च्या अनेक भागांचे दिग्दर्शनही केले होते.




