एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे. कोरोना संकटाचे कारण पुढे करुन ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मागणी फेटाळण्यात आल्यामुळे ठरल्याप्रमाणे मंगळवार, ८ सप्टेंबरपासून एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू होत आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय परीक्षेचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षेबाबत २१ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या राज्यातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर हजर राहून परीक्षा देण्याचे बंधन आहे. कोरोना संकटात परीक्षा केंद्रावर जाण्याच्या निमित्ताने संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा मुद्दा उपस्थित करत आठ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने विद्यार्थ्यांची मागणी फेटाळली.




