कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु होणार आहेत, येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.
विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही, याबाबत G. R. काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
युजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील महाविद्यालयं सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून देखील होत होती. याबाबत काही बैठका देखील झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयं सुरू होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.