नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या करावल नगर भागातील जोहरीपूर येथे गुरुवारी सकाळी चहा बनवण्याच्या वादातून एका व्यक्तीने खिडकीची काच फोडून पत्नीला भोकसले. आईचा आरडाओरडा ऐकून तीन मुलींनी तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर आरोपी वडिलांनी त्यांच्यावरही हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबात पती भीमसेन व्यतिरिक्त काजल, तनु आणि अनु या तीन मुली होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या आरोपी नवऱ्याला दारू पिण्याची सवय आहे आणि तो कोणतेही कामही करत नाही. मोठी मुलगी काजल खासगी बँकेत काम करते. तनू ही डीयू कॉलेजमध्ये शिकत आहे, तर मृताची धाकटी मुलगी अनुने यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. सकाळी 6.30 च्या सुमारास संगीता या कुटुंबासाठी स्वयंपाक करत होत्या. इतक्यात तिचा पती भीमसेन उठला आणि त्याने पत्नीला चहा करायला सांगितला. संगीताने स्वयंपाक करून झाल्यावर चहा बनवते, असे सांगितल्याने भीमसेन संतापला.
त्यानंतर भीमसेन याने रागाच्या भरात खिडकीची काच फोडून पत्नीच्या मानेवर वार केले. संगीता यांनी मुलींना आवाज दिला असता त्याने आपली मुलगी काजल, अनु आणि तनु यांनाही काचा मारून जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या १८ वर्षांच्या धाकट्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोन मुली आणि पत्नीवर गुरुतेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठी मुलगी काजलची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि आरोपी भीमसेनचा शोध सुरू केला आहे.




