विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण ९० रुग्ण उपचार घेत होते. अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक परिश्रमानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे :
उमा सुरेश कनगुटकर – स्त्री
निलेश भोईर – पुरुष
पुखराज वल्लभदास वैष्णव – पुरुष
रजनी आर कडू – स्त्री
नरेंद्र शंकर शिंदे – पुरुष
कुमार किशोर दोषी – पुरुष
जनार्धन मोरेश्वर म्हात्रे – पुरुष
रमेश टी उपायन – पुरुष
प्रवीण शिवलाल गौडा – पुरुष
अमेय राजेश राऊत – पुरुष
शमा अरुण म्हात्रे – स्त्री
सुवर्णा एस पितळे – स्त्री
सुप्रिया देशमुख – स्त्री
सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार- नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे या घटनेवर बोलताना म्हणाले की, प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचं समजतंय. अचानकपणे एसीचा स्फोट झाल्याने केवळ दोन ते तीन मिनीटात सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे रुग्णांना वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा केली.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) April 23, 2021




