बिहार : अररिया जिल्ह्यातील पलासीच्या कबाया गावात एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू झाला. ही सर्व मुलं अडीच ते 5 वर्षांची होती. ते सर्वजण एका खोलीत मक्याचे कणीस भाजत होते. मात्र, तिथे जवळच गुरांसाठी सुका चारा ठेवलेला होता. त्यात ठिणगी पडून अचानक आग लागल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आग लागल्यानंतर इतर मुलांनी आरडाओरड केली, त्यानंतर मुलांना वाचवण्यासाठी आसपासचे लोक धावले. गर्दीतील काही तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलांपर्यंत पोहोचण्याआधीच निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने अग्निशमन विभागालाही कळविण्यात आले. पोलिसांनी मुलांचे मृतदेह काढून जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. आगीच्या घटनेमुळे आणि आगीत 6 निरपराध मुलांनी जीव गमावल्यामुळे कबैय्या गावात शोककळा पसरली आहे.




