परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचे लोकसभेत देखील तीव्र पडसाद पडले आहेत. याप्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असून त्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे.
“महाराष्ट्रात खंडणी वसुली करण्याचं काम सुरु आहे असं माझे सहकारी सांगत आहेत. त्यावरुन मी सांगू इच्छिते की, जो व्यक्ती सोळा वर्ष निलंबित होता. त्याला पुन्हा सेवेत का घेतलं? कुणी घेतलं?, याची चौकशी करण्यात यावी. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना पोलीस दलात घ्यायला नकार दिला होता. शिवसेनेने वाझेंसाठी फडणवीसांवर दबाव आणला होता. ज्यादिवशी ठाकरे सरकार आलं तेव्हा परमबीर सिंह यांना फोन करुन सर्वात आधी सचिन वाझेंना सेवेत घेतलं. सचिन वाझेंमुळे परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली,” असं नवनीत राणा यांनी सांगितलं.
नवनीत राणा पुढे म्हणाल्या कि, “जर हा प्रकार असाच सुरू राहिला तर संपूर्ण देशात खंडणी वसुलीचा पायंडा पडेल. ज्याप्रकारे इतरांवर लागले आहेत, मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे. बदल्या करणं, खंडणी वसुल करणं यामध्ये इतर कोणीही सहभागी नाही. एकट्या मुंबईतून महिन्याला १०० कोटी वसुली होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती होत असेल?”