मुंबई : औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज (२४ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांना अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीविषयी विचारलं असता त्यांनी अशा मागण्या होतच असतात. पण औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की, असे सूचक वक्तव्य केले. मात्र त्यामुळे आता महाविकासआघाडीत पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेविरोधात भूमिका मांडली होती. त्यानंतर या विषयावरून महाविकासआघाडीत कुरबुरी सुरु झाल्या होत्या. ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांवर टीकाही करण्यात आली होती.
संजय राऊतांनी मुस्लीम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत आहे, अशी घणाघाती टीका केली होती. परंतु औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.




