अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात असून, याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही नकार दिला. याप्रकरणी दाद मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात जाण्याची परवानगी देत न्यायालयानं याचिका मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर अर्णब गोस्वामी यांचे वकील मिलिंद साठे यांनी याचिका मागे घेतली.




