नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अचूक क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर देशात सुरक्षेची तीव्र तयारी करण्यात आली आहे. परिणामी, बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगर, लेह, अमृतसर आणि चंदीगड यांसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.
जम्मू, पठाणकोट, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर यासारख्या प्रमुख पश्चिम आणि उत्तरेकडील विमानतळांवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सरकार आणि संरक्षण मंत्रालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात मोठा परिणाम झाला असून, एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर तसेच काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी संबंधित भागांतील उड्डाणे तात्पुरत्या स्वरूपात थांबवली आहेत. प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची शक्यता असून, विमानतळ प्रशासनाकडून सतत सूचना दिल्या जात आहेत.




