मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येचे पडसादही सर्वत्र उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात येऊन स्वप्नीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर फेसबुक पोस्ट लिहून एमपीएससी व राज्य सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी म्हटलं होत कि, “‘एमपीएससी’ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर ‘एमपीएससी हे मायाजाल आहे’ असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच ‘एमपीएससी’ परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा.”




