उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीशी बोलण्यास नकार दिल्यामुळे एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, औरैयाच्या अजितमल येथील भिखेपूर येथे अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना 10 मुले आणि 1 मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा आणि मोठी मुलगी विवाहित आहेत. त्यांचा पाचव्या नंबरचा मुलगा शिवम याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु, या प्रेमप्रकरणाला शिवमच्या वडिलांचा विरोध होता. वडील शिवमला प्रेयसीशी बोलण्यास वारंवार नकार द्यायचे. त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. याचाच राग मनात ठेवून शिवमने झोपलेल्या वडिलांचा त्रिशुळाने भोकसून खून केला.
मृत अरविंद यांचा मुलगा प्रदीप याने सांगितले की त्यांच्या वडिलांनी शिवमला प्रेयसीशी बोलण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे शिवम खूप संतापलेला होता. शिवम सोमवारी संध्याकाळी रागातच घराबाहेर निघून गेला होता. त्यानंतर रात्री उशिरा तो घरी परतला. त्यावेळी त्याने हातात जवळच्या मंदिरातील त्रिशुळ आणले होते. त्यानंतर त्याने झोपलेल्या वडिलांना त्रिशुळाने भोकसले. वडिलांनी आरडाओरडा केला असता सर्वजण काय झाले ते बघण्यासाठी त्यांच्याकडे गेले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी वडिलांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु तोपर्यंत त्यांचे बरेच रक्त वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपी शिवम याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिस हवालदार महिलेने केला सासूला पेटवण्याचा प्रयत्न
रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली महिला, 2 वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले आईचे प्राण