मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तसेच, त्यांनी आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती आशिष शेलारांकडे केली. त्यानंतर आता मला पत्र देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे. पुढे म्हणताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय करू शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तर त्यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती. पण या स्टेजला आता त्या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल तर मला घेता येत नाही. पक्षात या संदर्भात चर्चा करावी लागेल. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चे अंति घेता येईल. असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022




