संगमनेर : राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाट्यात भाजपचे जेष्ठ नेते व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये त्यांना चांगले स्थान मिळेल, अशी अपेक्षा शिर्डी मतदार संघासह अहमदनगर जिल्ह्यातील त्याच्यां कार्यकर्त्याना होती.
ऐनवेळी वरिष्ठाच्या आदेशानतंर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागल्याने मतदार संघातील कार्यकर्ते नाराज झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आ. विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सरकार न आल्याने विखे पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तरीही त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला. पक्षाच्या उघड आणि गोपनीय मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे आता सरकार आल्यावर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. तर शिंदे गटाकडून दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा आहे. आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मात्र, या बातमीमुळे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद मिळेल अशी कार्यकर्त्याना आशा आहे. विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास ते सक्रीय राजकारणापासून दूर जाऊन त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येण्याची भीती कार्यकर्त्याना वाटत आहे. मात्र, आता मंत्रिपदाऐवजी त्यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे आले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत काहीही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे.




