रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेडला तब्बल २० लाख रुपये दंड ठोठावला आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे.
६ सप्टेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
ऑफकॉमने दिलेल्या माहितीनुसार, “रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात कार्यक्रम करताना भारताच्या अवकाश तसंच तांत्रिक विकासाची पाकिस्तानशी तुलना केली होती. चर्चेदरम्यान अर्णब गोस्वामी तसेच सहभागी लोकांनी केलेल्या कमेंट पाकिस्तानी लोकांविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या होत्या असं ऑफकॉमने सांगितलं आहे. कार्यक्रमात ‘पाकी’ शब्दाचा उल्लेख केल्याबद्दलही ऑफकॉमने आक्षेप नोंदवला आहे. हा वर्णद्वेषी शब्द असून युकेमधील नागरिकांना मंजूर नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कार्यक्रमात वारंवार पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख दहशतवादी, माकडं, गाढवं, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, खेळाडू, नेते सर्वजण दहशतवादी आहेत. तो पूर्ण देश दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवाद्यांविरोधात लढत आहात, असं गौरव आर्य, चॅनेलचे सल्लागार संपादक यांनी कार्यक्रमात म्हटलं होतं असा उल्लेख ऑफकॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं असून पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.