मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांना पुरुषांच्या जमावाने नग्न करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. याप्रकरणी पहिली अटक झाल्याची बातमी समोर येत आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी गुरुवारी ट्विट केले की व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेचच, घटनेची स्वतःहून दखल घेत, मणिपूर पोलिसांनी कारवाई केली आणि आज सकाळी पहिली अटक केली. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याची आम्ही खात्री करू. ज्यामध्ये फाशीच्या शिक्षेची शक्यताही विचारात घ्यायला हवी.
व्हिडिओमध्ये, दोन महिलांना (पोलिसांच्या नोंदीनुसार अनुक्रमे 40 आणि 20 वर्षे) पुरुषांचा जमाव रस्त्यावर आणि शेताच्या दिशेने नग्नावस्थेत ओढत आहे. यामध्ये काही लोक महिलांना शेताकडे ओढून जबरदस्तीने विनयभंग करताना दिसत आहेत. एफआयआरनुसार, दोन्ही महिला कुकी-झोमी समुदायातील कांगपोकपी या डोंगरी जिल्ह्यातील आहेत.
मणिपूरमध्ये जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. जेथे शांतता राखण्यासाठी केंद्रीय दल आणि लष्कर तैनात करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. मणिपूरच्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने ही घटना ४ मे रोजी घडल्याचा आरोप केला आहे. ITLF ने आरोप केला आहे की, दोन महिलांची भाताच्या शेतात नग्न परेड काढून त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आयटीएलएफने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या व्हिडिओवर संपूर्ण राजकीय जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित व्हिडिओ शेअर न करण्याचे आदेश जारी केले आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे, त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय कायद्यांचे पालन करणे अनिवार्य झाले आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
मणिपूर पोलिसांनी 4 मे रोजी थौबल जिल्ह्यात ही घटना घडल्याची पुष्टी केली. कांगपोकपी जिल्ह्यात 18 मे रोजी या प्रकरणी शून्य एफआयआर नोंदवण्यात आला होता. अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येसह दोन महिन्यांपूर्वी अज्ञात आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पीडितांनी कांगपोकपी जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. ज्यामध्ये शून्य एफआयआर नोंदवण्यात आला आणि हे प्रकरण थौबल येथील संबंधित पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. तक्रारीनुसार, आणखी एक 50 वर्षीय महिला होती जिला जमावाने जबरदस्तीने विवस्त्र केले. अल्पवयीन मुलीवर भरदिवसा पाशवीपणे सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडितांनी सांगितले आहे कि, 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यानंतर 800 ते 1000 लोकांनी त्यांच्या गावावर प्राणघातक शस्त्रे (AK रायफल, SLR, INSAS, 303 रायफल) ने हल्ला केला, त्यांनी लुटमार आणि जाळपोळ सुरू केली. हल्ल्यानंतर कुटुंबातील तीन महिला आणि एक पुरुष आणि एक किशोरवयीन मुलगा असे पाच सदस्य जंगलात पळून गेले होते. मात्र, ४ मे रोजी पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना गावात परत आणत होते. त्याचवेळी जमावाने त्यांना वाटेत अडवले. पोलिस ठाण्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जमावाने पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. प्रथम त्यांनी 20 वर्षीय मुलीच्या वडिलांवर हल्ला केला. जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलांना कपडे काढण्यास भाग पाडले. महिलांना रस्त्यावरून नग्न अवस्थेत ओढत शेतात नेण्यात आले. सर्वात लहान 20 वर्षांच्या मुलीवर सर्वांसमोर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप त्यांनी केला. यादरम्यान विरोध केल्याने मुलीच्या अल्पवयीन भावाचीही हत्या करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, nantr तिन्ही महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या आणि सध्या त्या मदत शिबिरात आहेत.
चुरचंदपूर येथे नोंदणीकृत जमातींचा एक गट असलेल्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने राज्य आणि केंद्र सरकार, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेची दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेची दाखल घेतली आहे. तसेच त्यांनी सांगितले कि, “मी देशाला आश्वासन देतो, कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही. कायदा पूर्ण ताकदीने चालेल. मणिपूरच्या मुलींवर जो अन्याय झाला, त्याबाबत दोषींना कधीही माफ केले जाऊ शकत नाही.”




