crime
देश

मुख्याध्यापक दाम्पत्याने केली स्वतःच्या मुलींची हत्या, सूर्योदयासोबत जिवंत होतील असा केला दावा

अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी स्वतःच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा दावा या माता-पित्याने केला. अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी मुलींचा अशा प्रकारे जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील हे आरोपी दाम्पत्य उच्चशिक्षित असून दोघंही मुख्याध्यापक आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले गावात रविवारी रात्री हत्याकांड घडले. 27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साईदिव्या अशी मृत तरुणींची नावं आहेत. शिवालयम मंदिर रोड परिसरात नायडू कुटुंब राहत होतं. मोठी मुलगी अलेख्याने भोपाळमधून मास्टर्स डिग्री मिळवली, तर साईदिव्या हिचं बीबीएपर्यंत शिक्षण झालं होतं. साईदिव्या मुंबईत एआर रहमान म्युझिक स्कूलची विद्यार्थिनी होती.

नायडू कुटुंब लॉकडाऊनच्या काळात विचित्र वागत होतं, अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. रविवारी रात्री घरातून आरडाओरड ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. डोक्यात डंबेल्सनी प्रहार करुन निर्दयी मातापित्याने लेकींचा बळी घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा एका मुलीचा मृतदेह पूजेच्या खोलीत होता, तर दुसरी मुलगी बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. दोघींचे मृतदेह लाल रंगाच्या कापडाने झाकलेले होते.

पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला हत्येचं कारण विचारलं असता त्यांनी अजब जबाब दिला. कलियुग समाप्त होत असून सोमवारपासून सतयुग सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही मुली सूर्योदयासोबत जिवंत होतील, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतलं असून दोघींचे मृतेदह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत