नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंतेत भर पडली असून राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. त्यांनी यावेळी अनेक मुद्यांवर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, देशात कोरोनाची दुसरी लाट तुफान बनून आली. ज्यांनी आपल्या नातलगांना गमावलं आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत डॉक्टर्स आणि नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले. कठीण परिस्थितीत धैर्य न गमवता त्याचा सामना देश करत आहे. देश मोठ्या संकटातून जात आहे. कोरोना योद्ध्यांना सॅल्यूट.
“आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी देखील लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. लॉकडाऊनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण अर्थव्यवस्थेसोबतच देशवासीयांच्या आरोग्याती देखील काळजी घेऊया”, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याविषयी बोलताना “करोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत”, असं यावेळी पंतप्रधानांनी नमूद केलं.
“यावेळी कोरोनाचे रुग्ण वाढताच देशातील औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले”, असं म्हणत मोदींनी तज्ज्ञांचं कौतुक केलं.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताने म्हणाले कि, “अर्थव्यवस्था आणि रोजी-रोटीवर कमीत कमी प्रभाव पडावा असाच सध्या प्रयत्न आहे. १८ वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध झाल्यामुळे श्रमिकांना लस उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारांनी मजुरांना विश्वास द्यावा की ते जिथे आहेत, तिथेच त्यांनी थांबावं. गेल्या वेळची परिस्थिती आत्तापेक्षा फार वेगळी होती. तेव्हा आपल्याकडे या संकटाशी लढण्यासाठी उपाय नव्हता. देशानं कोरोनाविरोधात आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढा दिला आहे. त्याचं श्रेय तुम्हा सगळ्यांना जातं. या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी. असं केलं, तर सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नाही.”




