मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात ६० हजारांहून अधिक रुग्ण सध्या ऑक्सिजनवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील भीषण परिस्थिती विषयी सांगितले. महाराष्ट्रात सध्या ६० हजारांहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर असून ७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स व २५ हजारपेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राला दररोज १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून ३०० ते ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याऐवजी जवळपासच्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध असणे गरजेचे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण रेल्वे मार्गाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण, प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी १३ हजार जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्सची मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी रेमडेसिवीरचा मुद्दादेखील उपस्थित केला. रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होतो. परिणामी ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र, दररोज २७ हजार व्हायल्स उपलब्ध आहेत. त्यासाठी रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे नमूद करताना परदेशातून रेमडेसिवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.




