नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानविरोधात निर्णायक पाऊल उचललं आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं आहे. या कारवाईत सुमारे ९० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ – दहशतवाद्यांना दिलं चोख उत्तर
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पहाटे १:३० वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या आतमध्ये दहशतवाद्यांचे गुप्त तळ लक्ष्य करत हवाई हल्ला केला. हे तळ दहशतवादी गटांच्या घातकी कारवायांसाठी वापरले जात होते. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी तातडीची सुरक्षा बैठक बोलावण्यात आली आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा LOC वर गोळीबार
भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार सुरू केला आहे. ७ मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने LOC ओलांडून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे. पूंछ जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराने त्वरित आणि तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की, भारतीय सेनेने दिलेल्या प्रत्युत्तरात पाक सैन्याचे मोठं नुकसान झालं असून, पाकिस्तानच्या अनेक चेकपोस्ट्सवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये आज बंद
सुरक्षा स्थिती लक्षात घेता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्यांतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज (७ मे) बंद ठेवण्याचे आदेश जम्मू विभागीय आयुक्तांनी जारी केले आहेत.
सरकारचा इशारा: दहशतवादाचा अंत करणारच
भारत सरकारने स्पष्ट केलं आहे की, दहशतवादाविरोधात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. संरक्षणमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाने ठामपणे सांगितलं आहे की, भारताची ही कारवाई केवळ सुरुवात आहे, आणि भविष्यात दहशतवादी गट व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्याच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, हा केवळ सहनशीलतेवर चालणारा देश नसून, आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी निर्णायक आणि ठोस पावलं उचलू शकतो. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात रोषाचं वातावरण होतं, ज्याला केंद्र सरकारने आक्रमक धोरणातून उत्तर दिलं आहे. यापुढे सीमा भागात सतर्कता आणि सुरक्षा अधिक वाढवली जाईल.