गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि एसपी यांना सर्व ठिकाणाहून हे आंदोलन संपवण्यास सांगितले आहे. यात गाझीपूरचा देखील समावेश आहे.
दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतरच पोलिस ऍक्शन घेत आहेत. शेतकरी नेत्यांना लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर हिंसाचार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांचे लक्ष सिंघू आणि गाजीपूर सीमेवर आहे, जिथं गेली दोन महिने शेतकरी आंदोलन करत आहेत.
दिल्लीतील ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर योगी सरकारने शेतकर्यांचे उपोषण संपवण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारने आंदोलन स्थळांवर बसेस पाठवून शेतकऱ्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास सांगितले आहे. आंदोलनकर्त्यांनी संध्याकाळपर्यंत ही आंदोलनस्थळं रिकामी करावीत, अशी घोषणा पोलिसांनी गुरुवारी सकाळी गाझीपूर सीमेवर केली होती.




