नवी दिल्ली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडणे अतिशय सामान्य आहे. परंतु, ही वीज पडल्याने बर्याचदा लोकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. रविवारी राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यात वीज पडल्याने अनेक लोकांचा बळी गेला.
जयपूरमध्ये वीज कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 जणांचा जयपूरच्या आमेर किल्ल्यावर बांधलेल्या वॉच टॉवरवर मृत्यू झाला. हे लोक येथे सेल्फी घेत असतांना वीज कोसळली, त्यावेळी सुमारे 35 लोक तिथे उपस्थित होते. वीज कोसळल्याने बरेच लोक खाली पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, विज चमकणे आणि वीज कोसळणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपणास आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर वीज पडण्याच्या घटना जवळजवळ दर मिनिटाला घडतात. जेव्हा विज कोसळते, तेव्हा आकाशातील तापमान सुमारे 15,000 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत असू शकते. वीज केव्हा व कोठे कोसळेल, हे सांगता येत नाही.
प्रतिबंधात्मक उपाय :
- आपण घरात असाल आणि वादळ किंवा पाऊस सुरु असेल तर, आपल्या टीव्ही, रेडिओ, फ्रिज किंवा इतर विद्युत उपकरणे बंद करा आणि अशा वस्तूंचे प्लग काढून ठेवा.
- पावसात मोबाइल वापरणे टाळा.
- अनवाणी पायाने जमिनीवर उभे राहू नका.
- विद्युत उपकरणांपासून दूर रहा. तसेच, अशा गोष्टींपासून दूर रहा जे विजेचे वाहक होऊ शकतात. जसे लोखंडी पाईप्स इ.
- झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळा आणि इमारतीच्या खाली लपून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करा.
- आपल्याकडे रबरचे बूट असल्यास, घरातून बाहेर पडताना शक्यतो त्यांचा वापर करा.




