नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी आज राज्ये व इतर भागधारकांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन बारावीची परीक्षा आता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विविध राज्यातील शिक्षण मंडळांनी घेतला होता. पण आता बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे सावट पाहता CBSE ची बारावीची परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे जाहीर करावा अशी सूचना केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाकडे केली आहे. तेव्हा वर्षभरात पार पडलेल्या अंतर्गत परीक्षांच्या आधारावर किंवा असाईनमेंट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुण दिले जाऊ शकतात.
ही बैठक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. पण त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यापूर्वी 23 मे रोजी केंद्रीय शिक्षण विभागाने यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत विविध राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्यांची काय भूमिका आहे याची माहिती 25 मेपर्यंत मागवण्यात आली होती. यासंदर्भातील अंतिम निर्णय 1 जूनपर्यंत जाहीर करण्यात येईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितलं होतं.
सर्वोच्च न्यायालयातही बारावी परीक्षाप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 3 जून रोजी होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला आपली बाजू सर्वोच्च न्यायालयातही मांडावी लागणार आहे.
Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. After extensive consultations, we have taken a decision that is student-friendly, one that safeguards the health as well as future of our youth. https://t.co/vzl6ahY1O2
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2021




