नवी दिल्ली : दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात बजरंग दलचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची निर्घृण हत्या झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यासह अनेकांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. रिंकू शर्मा याची आई राधा शर्मा यांनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे.
राधा शर्मा यांनी सांगितलं कि, “माझा मुलगा त्या दिवशी मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेला होता. तिकडून तो घरी आला. थोड्या वेळाने काही जण अचानक घरात घुसले आणि त्यांनी आमच्या कुटूंबावर हल्ला झाला. त्यांनी माझ्या मुलाला फरफटत बाहेर नेले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार केले.”
मिळालेल्या माहितीनुसार, दानिश, इस्लाम, मेहताब आणि जाहीद हे सर्वजण बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आले. त्यांच्याकडे शस्त्रे आणि काठ्या होत्या. रिंकूच्या घराबाहेर येऊन ते शिवीगाळ करू लागले. त्यानंतर इस्लाम याने रिंकूचा गळा पकडला आणि त्याच्यावर हल्ला केला. मेहताब याने रिंकूवर चाकूने सपासप वार केले. मनु आणि रिंकूचा मित्र विशाल धावून आला, तेव्हा त्याच्यावरही आरोपींनी हल्ला केला. रिंकूला रुग्णालयात दाखल केले,परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रिंकू शर्माच्या आईने पुढे सांगितले की तिचा मुलगा रिंकू हा लॅब टेक्निशियन होता आणि हल्लेखोरांशी त्याचा कोणताही वाद नव्हता. रिंकू शर्माच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, तो संघाचा भाग असल्याने आणि राम मंदिर बांधण्यासाठी देणग्या गोळा करत असल्यामुळेच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.




