लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अभिनेता दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण साहिब धार्मिक ध्वज फडकावला होता.दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला होता. त्याचबरोबर दीप सिद्धूला अटक करण्याची मागणी केली जात होती. आज दिल्ली पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.




