मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी गोस्वामी यांची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे अर्णब यांना इशारा दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सु्प्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर अर्णब यांनी तळोजा कारागृहाबाहेर जमलेल्या गर्दीपुढे वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, ‘उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. त्यांनी मला जुन्या प्रकरणात अटक करायला लावली आणि माझी माफीही मागितली नाही. खरा खेळ तर आता सुरू झाला आहे. मी आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार आहे. मी तुरुंगात असलो तरी वाहिनी सुरू करेन. तुम्ही काहीच करू शकणार नाही.’
त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना अर्णब यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करतो. सुप्रीम कोर्टाने अर्णब यांना तात्पुरता जामीन दिला आहे, असे नमूद करतानाच अर्णब यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर खैरे यांनी निशाणा साधला. अर्णब यांच्या अँकरिंगची भुंकण्याशी तुलना करत त्यांना किती बोलायचे ते बोलू दे. त्याने काहीच फरक पडणार नाही. आमच्यासारखे शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनाही महाराष्ट्रातच राहायचे आहे, इतके फक्त ध्यानात राहू द्या.”




