मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
मात्र, अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. यावर आम्ही समाधानी नाही. सचिन वाझे यांची बदली नाही तर त्यांचं निलंबन केलं पाहिजे, जोपर्यंत सचिन वाझेंचं निलंबन होत नाही तोवर अधिवेशन चालू देणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं. ठाकरे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारं सरकार आहे. या सरकारची प्रतीमा मलीन झाली आहे. सचिन वाझेंना तात्काळ अटक झाली आहे. त्यांचं निलंबन करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे. सचिन वाझेंना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे, असा आरोप प्रविण दरेकर यांनी यावेळी केला.
“मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे असा आरोप करताना सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.




