मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं.
या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असेही त्या म्हणाल्या. दहावीचा निकालाचे सत्र शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. या सूत्रानुसार इयत्ता नववी व दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये शाळांनी घेतलेल्या परीक्षांचे गुणांचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० गुण
- विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यवक्षक परीक्षा यांच्या आधारे २० गुण
- विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीच्या अंतिम निकालात मिळालेल्या गुणांचे ५० टक्के वेटेज
- वरीलप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुणांपैकी मूल्यांकन होणार
- म्हणजेच प्रत्येक विषयातील १०० गुणांपैकी नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वेटेज वापरून तयार होणार अंतिम निकाल
ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे. मंडळामार्फत जून 2021 अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे. त्याकरता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे .
फेरपरीक्षा देणारे विद्यार्थी (Repeater Student), खाजगी ( Form no.17), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक CET घेणार आहोत. सदर प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. 100 गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.




