मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधताना शाळा सुरू झाल्याबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायच्या नाही हा निर्धार करू या आणि आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मला माझे शाळेतले दिवस आठवतात. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होते आणि आहे. मुले नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मी नेहमी या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना :
- आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या.
- शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी.
- पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोगही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वानी काम करावे.
- शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी
- निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करतांना देखील काळजी घ्या.
- मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी.




