कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगितलं आहे. या निर्णयानंतर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर संभाजी राजे यांनी मराठा समाजाला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने जोमाने बाजू मांडली. केंद्र सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळं कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी आदर करतो, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. तसंच, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचे आवाहन केलं आहे. तसंच, कोरोनाची महामारी आहे, कोणीही उद्रेक करु नका. आपली लोकं जगली पाहिजेत. कोरोनामुळं संयम ठेवा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.
समाजानं जगाला दाखवून दिलं आरक्षणाची किती गरज आहे. शांतताप्रिय मोर्चे काढले. जगाला आम्ही दाखवून दिलं होतं मोर्चे कसे असतात, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. आधीच्या सरकारनेही जोमानं बाजू मांडली होती. या सरकारनंही चांगली बाजू मांडली होती. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यावर आपण काही बोलू शकत नाही. बाकीच्या राज्यांना ५० टक्क्यांवर आरक्षण दिलं गेलं, महाराष्ट्राला दिलं गेलं नाही ही समाजाच्यावतीने दुर्दैवी बाब आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण रद्द करत असल्याचे सुप्रीम कोर्टाने आज सांगितले. मराठा समाजासाठी आजचा निकाल दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे.
https://t.co/MHVi1dSWxh— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 5, 2021




