पुणे : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजला असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाली असून काही ठिकाणी जमीनही वाहून गेली आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपासून (२६ सप्टेंबर) महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पोषक हवामानामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर सोमवारपर्यंत जोरदार पाऊस कोसळणार आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत उद्या पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी (२७ सप्टेंबर) राज्यातील ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज (२५ सप्टेंबर) चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवार (२७ सप्टेंबर) रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाट परिसर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यासाठी पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे. राजस्थानमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र मान्सून सक्रिय आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार असून २७ आणि २८ सप्टेंबरला मराठवाडा व कोकणात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर २८ व २९ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, पुणे-मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल.




