पुणे : तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेत मयूर रामदास घोडे (10), आनंद विजय खाडे (11) आणि साहिल रंगनाथ घोडे (14) या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ही घटना घडली.
निमगाव सावा येथील ओढ्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मयूर, आनंद आणि साहिल रविवार (१३ मार्च) रोजी दुपारी सायकलवरून गेले होते. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटू लागली, त्यांनी गावकऱ्यांसह शोधाशोध सुरु केली. या दरम्यान, बंधाऱ्याच्या कडेला तिघांचे कपडे व चपला दिसल्या. त्यावरून ते ओढ्यात पोहण्यासाठी गेले असावेत असा संशय व्यक्त करण्यात आला. पाण्यात उतरून शोध घेतला असता त्यांचे मृतदेह पाण्यात आढळले. या घटनेने तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.