पुणे : विठ्ठलाच्या नामजपात वारी सुरु असून टाळ मृदुंगाच्या तालावर भाविकांचे पाय ताल धरत आहेत. वारीतील तमाम भाविकांना आता विठुरायाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. 22 व 23 जून रोजी पुण्यात मुक्काम केल्यानंतर आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सुमारे चार लाख भाविक आळंदीत दाखल झाले होते. 21 रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी प्रस्थान करण्यापूर्वी पहाटे चार वाजता घंटानाद, काकड आरती व अभिषेक झाला. त्यानंतर 9 ते 11 वीणा मंडपात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले, दुपारी माऊलींच्या समाधीची आरती करण्यात आली. मान्यवरांना प्रसादाचे वाटप करून माऊलींच्या पादुका मंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मोठ्या भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. परंपरेनुसार सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाडा येथे झाला.
पुण्यातून निघताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तितक्याच उत्साहात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष करत होते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शहराने पुन्हा तीच ऊर्जा आणि चैतन्य अनुभवले. संगमवाडी पुलावर दोन्ही पालख्या विलीन होऊ लागल्याने आनंद आणि भक्ती द्विगुणित झाली. काही संस्थांनी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी मंडप उभारले होते तर अनेकांनी बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले होते. त्यानंतर 22 व 23 रोजी पुण्यात मुक्काम केला. आज 24 उद्या 25 जून सासवड येथे पालखीचा मुक्काम असेल. सासवडचे ग्रामस्थ पालखीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचनकडे मार्गस्थ झाला.
जय हरी माऊली??#Wari2022 #Pune #Nisargshingavi pic.twitter.com/QUS3u4XGCD
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) June 24, 2022
सोहळ्यादरम्यान महापालिकेच्या आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आदींची तयारी पूर्ण झाली आहे. सासवड नगरपालिकेने पालखी काळात सासवड परिसरात कचरा उचलण्यासाठी 20 वाहने आणि 150 कर्मचारी तैनात केले आहेत.