शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम 273 अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. त्यांचं हे वागणं आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामी यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. तसेच या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही सरनाईक यांनी सभागृहात केली.
अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात या नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.




