मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूड भावनेने केली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवारांनी म्हटलं आहे की, “कंगनाचं कार्यालय अधिकृत की अनधिकृत माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहोत. पण शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं असेल”.
दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली असून उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने पालिकेकडे उत्तर मागितलं आहे.




