महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात याआधी काही राज्यात निपाह विषाणू आढळला होता पण महाराष्ट्रात याआधी वटवाघळांमध्ये निपाह विषाणू कधीही आढळला नव्हता. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेत संशोधन केले होते. हा विषाणू वटवाघूळांमधून मानवाच्या शरिरात संक्रमित होतो, अशी माहिती याबाबत संशोधन करणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने निपाह व्हायरसला रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्येठेवलं आहे. अद्याप निपाह व्हायसरवर कोणतंही औषध किंवा लस नसून तो खूप धोकादायक मानला जातो. याचा मृत्यूदरही अधिक आहे. निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. तसेच कोरोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे.
देशात यापूर्वी २००१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. २००७ मध्ये एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसने अक्षरशः थैमान घातलं होतं.
निपाहची लक्षणे कोणती?
- मानसिक गोंधळ
- प्रचंड ताप
- डोकेदुखी
- स्नायूदुखी
- उलट्या
- प्रकाशाची भीती वाटणे
प्रसार कसा होतो?
- वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यास
- संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास
- एनआयव्हीचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातून




