मुंबई: राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला विरोध दर्शवण्यात आला आहे. याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनच्या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे व्यापारी वर्गातूनही लॉकडाऊनला विरोध आहे.
राज्यातील रुग्णवाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. बैठकीत निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावावा असे मत नोंदवले गेले. त्यासाठी नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. एकीकडे या परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत, मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.