Water resources project in Nashik district will start soon

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

नाशिक महाराष्ट्र

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून या कामांना तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना बैठकीत दिली.

मंत्रालयातील दालनात नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक पार पडली या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी, सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरूण नाईक, कार्यकारी अभियंता संगीता जगताप उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन संबंधित यंत्रणांकडून ही कामे मंजूर होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातंर्गत असलेले प्रकल्प मार्गी लागतील, असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील प्रकल्पांची कामे लवकर सुरू करा – पालकमंत्री भुजबळ

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी महाजे, यासह इतर प्रवाही वळण योजना, तसेच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी – डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्णं कामे मार्गी लागतील. कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पालाही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

त्याचबरोबर पार – गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे. या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलिकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे या सर्व साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन त्यामुळे शक्य होणार आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पार -गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक ३ व ४ मंजूर करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री यांच्याकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत