मुंबई : दादर कोर्टाने रस्ते अपघातांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्त्यावर पायी चालणाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे एखादा अपघात झाल्यास त्यासाठी कार चालकास जबाबदार धरता येणार नाही, असे कोर्टाचे नमूद केले आहे.
दंडाधिकारी कोर्टाचे न्यायाधीश प्रवीण पी. देशमाने म्हणाले, रस्त्यावर चालताना किंवा रस्ता ओलांडताना सावधगिरी बाळगणे हे एका पादचारी (पायी चालणाऱ्या) व्यक्तीचे कर्तव्य आहे. पादचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखादा अपघात झाला, तर वाहन चालकाला त्यासाठी गुन्हेगार मानले जाणार नाही, असे नमूद करून न्यायाधीश देशमाने यांनी एका 56 वर्षीय महिला व्यावसायिकेला 5 वर्षापूर्वीच्या रस्त्यावरील अपघाताच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, 20 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9 वाजता एक महिला पायी चालत तिच्या ऑफिसला जात होती, तेव्हा मागून येणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली. त्यामुळे ती महिला जमिनीवर पडली आणि कारचे एक चाक तिच्या पायाच्या अंगठ्यावरून गेले. ही कार एक महिला व्यावसायिक चालवत होती. तथापि, अपघात होताच महिलेने गाडी थांबविली होती. दुसर्याच दिवशी जखमी महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. काही आठवड्यांनंतर जखमी महिलेचा जबाब नोंदविण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला. भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला की पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बनवले आहेत आणि वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु, जखमी महिला रस्त्यावर चालत होती. त्यामुळे कार चालकास दोषी मानले जाऊ शकत नाही, असे नमूद करून कोर्टाने गाडी चालवणाऱ्या महिलेला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.




