मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसाच्या पठणावरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शिवसेना कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले आहे.
हनुमान चालीसा पठणावरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असून आज तो नाट्यमयरित्या संपुष्टात आला आहे. सकाळी नऊ वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार होते. या घोषणेने संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी सकाळी राणा दाम्पत्याच्या अमरावती आणि मुंबईतील निवासस्थानी पोहोचून गोंधळ घातला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. बॅरिकेडिंग तोडण्यात आले. बराच वेळ शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभे होते. अखेर राणा दाम्पत्याला आपला कार्यक्रम मागे घ्यावा लागला.
शिवसैनिकांच्या तक्रारीवरून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसैनिकांनी भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यावरून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कलम १५३ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचून दोघांनाही खार पोलीस ठाण्यात नेले. दोघांची चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी अटक केल्याची पुष्टी केली.




