मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत कार्यालयात थेट उपलब्ध असतात. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेनुसार, दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत मी मायबाप जनतेला भेटण्यासाठी,पक्षाच्या बेलार्ड इस्टेट,फोर्ट येथील कार्यालयात थेट उपलब्ध असतो.आजचा दुसरा सोमवार आहे.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न थेट सोडवता येतात,यासारखे दुसरं समाधान नाही. pic.twitter.com/Bwj3qYcHMw— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2020
पूर्व उपनगरातील टागोरनगर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबद्दल जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुंबईतील रिकाम्या जमिनींविषयीचे खटले न्यायप्रलंबित आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर ही घरे बांधण्यात येतील असेही आव्हाड यांनी सांगितले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात घरे किंवा फ्लॅट्स बांधून देता येतील.




