मुंबई : मालाड पूर्व दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तीस वर्षीय व्यक्तीच्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेल्या 9 वर्षात 50 पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केला असल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. या आरोपीला 2011 साली एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतरही या नराधमाने आणखी 50 महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला.
दिंडोशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपीने एका 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग करुन पळ काढला होता. संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता. आरोपीच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक चव्हाण आणि उपनिरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आलं होतं. या पथकानं सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. त्यामाध्यमातून पोलीस आरोपी कल्पेश देवधरपर्यंत पोहचले आणि त्याला अटक केली.
एखादा गुन्हा केल्यानंतर कल्पेश देवधर वारंवार आपला पत्ता बदलायचा. मुंबईमध्ये विविध पोलिस स्टेशनमध्ये कल्पेश्वर विनयभंग, अपहरण असे मिळून 12 गुन्हे दाखल आहेत, ज्यात त्याला अटक ही झाली होती. काही गुन्हे आहेत ज्यामध्ये कल्पेश देवधर हा वॉन्टेड आहे तर काही विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये पीडितेकडून तक्रार करण्यात आली नाही. 13 जुलै 2017 रोजी कल्पेश देवधर याने पवई हिरानंदानी येथे महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनीसमोर अश्लील चाळे करून फरार झाला होता असंही चौकशीतून समोर आलं. आरोपीवर विनयभंग, मारामारी, अपहरण आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे असे गंभीर गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. आत्तापर्यंत सुमारे 50 महिलांचा विनयभंग केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी पीडितांना समोर येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.




