तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिकेचे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. अभिषेक यांनी कर्ज घेतल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. अभिषेक मकवाना यांना कर्ज घेतल्यापासून फोनवरुन धमक्या दिल्या जात होत्या. कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात होता. अभिषेक मकवाना हे सायबर फ्रॉडचे बळी ठरले होते, असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
अभिषेक मकवाना यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद चारकोप पोलिसांनी केली होती. मात्र आता ही आत्महत्या असल्याचं समोर आलं आहे. २७ नोव्हेंबरला अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरातल्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या भावाने सांगितले कि, “अभिषेकचा मृत्यू झाल्यानंतर मी त्याचे काही मेल चेक केले. त्यामध्ये अभिषेकला अनेक नंबर्सवरुन फोन येत असल्याचं समजलं. तसंच ते सगळे फोन कॉल्स कर्ज फेडण्यासंदर्भातले होते. एक कॉल बांगलादेशातून तर एक कॉल म्यानमारमधून आल्याचंही मला समजलं. इतर कॉल्स भारतातल्या इतर भागांमधून येत होते असंही समजलं.”