अहमदनगर : खासदार सुजय विखे यांना खडसेंच्या पक्षांतराबद्दल विचारलं असता ते म्हटले , एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. मी भाजपमध्ये नव्हतो, त्या आधीपासून ते पक्षात होते. ते गेल्यामुळे पक्षाला निश्चितच नुकसान होणार आहे. पण तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मी पक्षात नवीन आहे. मला एकच वर्ष झाले. त्यामुळे एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० वर्षे पक्षात राहिलेल्या व्यक्तीवर टीकाटिपण्णी काय करणार,’ असं सुजय विखे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. इतकी वर्षे पक्षात राहिल्यानंतर ते आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील असं कोणालाही वाटत नव्हतं. भाजपचे अनेक नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळंच खडसेंच्या पक्षांतराचा भाजपला धक्का बसला आहे. खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे.




