मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं असून अनेक भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आजही मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
आज मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना देखील हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील चोवीस तासांत या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून वेगवान वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.




